
सर्वसामान्यांच्या हिताचा आणि सर्वसमावेशक विकासाचा अर्थसंकल्प : डॉ. धर्मरावबाबा आत्राम
गडचिरोली:
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प हा देशातील शेवटच्या घटकाला केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेला, सर्वसामान्य नागरिकांचे हित जोपासणारा आणि सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा असल्याचे मत अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केले आहे.
या अर्थसंकल्पात कृषी, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मूलभूत गरजांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शेतकरी, युवक, विद्यार्थी, महिला, कामगार तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्याने समाजातील प्रत्येक घटकाला याचा लाभ होणार असल्याचे डॉ. आत्राम यांनी सांगितले.
विशेषतः कृषी क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, यंत्रसामग्री आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. यामुळे उत्पादनक्षमता वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळून कृषीपूरक उद्योगांना गती मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.
तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी देशाच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत, दर्जेदार शिक्षण व्यवस्था आणि सक्षम आरोग्य सेवा उपलब्ध झाल्यास नागरिकांचा जीवनमान उंचावेल, असे डॉ. आत्राम यांनी स्पष्ट केले. सामाजिक न्याय, सांस्कृतिक संवर्धन आणि औद्योगिक प्रगती यासाठी करण्यात आलेल्या तरतुदी अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
एकूणच हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा समतोल राखणारा, सर्वसमावेशक विकास साधणारा आणि देशाच्या प्रगतीला नवी दिशा देणारा असून, येणाऱ्या काळात त्याचे सकारात्मक परिणाम सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास आमदार डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांनी व्यक्त केला.








